ज्ञानदीप माध्यमिक व सौ अनुसया वाढोकार विद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न

ज्ञानदीप माध्यमिक व सौ.अनुसया वाढोकार विद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न
निगडी :रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानदीप माध्यमिक व अनुसया वाढोकार उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप (शुभेच्छा) समारंभ उत्साही व भावनिक वातावरणात संपन्न झाला. फेब्रुवारी–मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या २६७ विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी हा समारंभ गुरुवार, दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास लोकमतचे पत्रकार औदुंबर पाडुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिस्त, सातत्य, परिश्रम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर यश निश्चित मिळते, असा प्रेरणादायी संदेश दिला. यावेळी इंग्रजी विषयाचे शिक्षक रमेश तिरखुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांच्या वतीने विज्ञान शाखेतील तन्मयी नेरकर व वाणिज्य शाखेतील गायत्री पवार यांनी मनोगत व्यक्त करत शाळेतील आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि भावी स्वप्नांविषयी भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद सुधाकर दळवी यांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसह पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे सचिव सूर्यकांत भसे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सुनील गारगोटे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलजा झगडे व बाळासाहेब पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन सभापती सुभाष चौधरी यांनी मानले. निरोप समारंभ विद्यार्थ्यांच्या मनावर भावनिक व प्रेरणादायी ठसा उमटवणारा ठरला.





